‘अरतें ना परतें’ हा साहित्य अकादमी विजेते लेखक – कवी प्रवीण दशरथ बांदेकर यांचा नवीन लेखसंग्रह. दै. लोकसत्ताच्या रविवार पुरवणी ‘लोकरंग’ मध्ये लेखक लिहीत असलेल्या याच नावाच्या सदरातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह होय. यात सदरांतर्गत प्रसिद्ध झालेले 26 आणि इतर 2 असे एकूण 28 लेख आहेत.
बांदेकरांचं लेखन मुळात मातीशी नातं सांगणारं आहे पण त्यांची निरीक्षण आणि आकलन शक्ति सभोवतालाला मध्यभागी ठेवून जागतिक घटनांची नोंद घेणारी आहे. घटनांच्या मुळाशी जाण्याची जाणीव त्यांच्या लेखनाची जातकुळी सांगणारं रूप आहे. समकालीन प्रश्न विचारताना त्याचे परीघ, परिणाम आणि त्याची बीजं त्यांच्या लेखनात दिसतात. प्रस्तुत पुस्तक समकालीन व्यवस्थेचं फक्त चित्र नसून एका संवेदनशील आणि जाणत्या लेखकानं घेतलेली चौकस नोंद आहे.
गणेश विसपुते प्रस्तावनेला दिलेल्या शीर्षकात म्हणतात तसं, ‘विवेकाचं भान जगावणारं जागल्या लेखकाचं चिंतन’ म्हणजे हा लेखसंग्रह होय!