वाचनीयता आणि सहज विनोद घडवून कथानियमांच्या सगळ्या चाकोऱ्या या कादंबऱ्यांतही त्यांनी मोडल्या आहेत. दोन्ही कादंबऱ्यांचे शेवट पाहिले, तर निवेदकाची टोकाची भ्रमिष्ठावस्था लक्षात येऊ शकते. या कादंबऱ्यांमध्ये भाऊ पाध्ये आणि दिलीप चित्रेंच्या कथन साहित्यासारखे मुंबईचे धमन्यासौष्ठवत्व दिसत नाही. श्रीकांत सिनकर यांच्या रिपोर्ताजी शैली असलेल्या कादंबऱ्यांशी त्या किंचित जवळीक साधतात, पण कादंबरीचा पूर्ण तोंडवळा स्वतंत्र आणि खास खोतांच्या तिरकस-तिरसटपणातून तयार झालेला. ‘इराकती’ सारखे आज साहित्य आणि जगण्यातून गहाळ झालेले शब्द यात वाचायला मिळतात आणि या लेखकाने विचित्रपणातूनही किती चमत्कार करून दाखविले, यांचा शोध लागू शकतो. तब्बल चाळीस वर्षांनी खोतांच्या दुर्मीळ कादंबऱ्यांत समाविष्ट असलेले ‘दुरेघी’ हे पुस्तक नव्या रुपात पुन्हा प्रकाशित होतेय. त्या वाचून हा मराठीतला हा ‘कॅप्टन फिक्शन आणि नॉनफिक्शन’ समजून घेण्याच्या फंदात अधिकाधिक लोक पडतील, अशी अपेक्षा करतो.
– पंकज भोसले, प्रस्तावनेतून